माझी कविता
येते कानावर शीळ
ध्यानीमनीही नसता
माझ्या मनाच्या अंगणी
गाते वेल्हाळ कविता
घेती काळजाचा ठाव
तिच्या सुरेल लकेरी
पाय रोकड्या शब्दांचे
पंख अर्थाचे सोनेरी
तिची उफराटी तर्हा
जगावेगळीच रीत
नाही येण्याला कारण
नाही जाण्याला गणित
तिच्यासाठी जोपासावे
नाते एकेक हिरवे
मुक्या कळ्यांनी करावी
रोज ऋतूंची आर्जवे
तिला द्यावयास झोका
फांदी फांदी आसुसावी
तिची वाट पहाताना
पळे युगेच भासावी
अंती सोडावा निःश्वास
जेव्हा निराश होऊन
पंख हिचे झळाळावे
तोच निःश्वास लेवुन
हिच्यासाठी साठवावा
हिर्यामाणकांचा चारा
हिची तहान भागवी
डोळ्यांतील अश्रू खारा
असे वेडे हे पाखरू
कधी अवचित येते
त्याच्या मंजूळ नादाने
पुन्हा नादावून जाते..
No comments:
Post a Comment