19 May, 2010

तू माझ्यात


तुझे मुक्त अस्तित्व गात्रांत माझ्या
तुझा गंध, बेधुंद श्वासांत माझ्या ..
तुला ठेविले मी जरी काळजात
सखे तु उतरलीस प्राणांत माझ्या ..
जरी पेंगला चंद्र गगनात राणी
तुझे स्वप्न जागेच डोळ्यांत माझ्या ..
तृषा भागली ना अजूनी मनाची
तुझे ओठ गुंफून ओठांत माझ्या ..
मला जायचे चांदण्यांच्या महाली
तुला घेउनी बाहुपाशांत माझ्या ..
कळेना तुला मूक भाषा मनाची?
गडे शोध तू अर्थ गाण्यांत माझ्या ..

माय


कहि कविता माझी नसून प्रसिद्ध कवी नारायण सुर्वे यांची आहे. परंतु माझी आवडती कवीता आहे.

हंबरून वासराले चाटते जवा गाय,

तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय

रे हंबरून वासराले ...................

आया बाया सांगत व्हत्या, व्हतो जवा तान्हा,

दुस्काळात मायेच्या माझ्या आटला व्हता पान्हा,

पिठामंदी..... पिठामंदी

पिठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय ..........

तवा मले पिठामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय..........

रे हंबरून वासराले...................

कण्या काट्या वेचायला माय जाइ राणी,

पायात नसे वाहन तिच्या फिरे अनवानी,

काट्या कुट्या .......... रं काट्या कुट्या

काट्याकुट्यालाही तीचं मानत नसे पाय,

तवा मले काट्यामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय..........

रे हंबरून वासराले...................

बाप माझा रोज लावी, मायेच्या मागे टुमन,

बास झालं शिक्षाण आता, घेवुदे हाती काम,

आग शिकून शान .....ग शिकून शान.....

शिकून शान कुठ मोठा मास्तर व्हनार हायं...

तवा मले मास्तरमंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय..........

रे हंबरून वासराले...................

दारू पिवून मायेला मारी जवा माझा बाप,

थरथर कापे अन, लागे तीले धाप,

कसा ह्याच्या .......रं कसा ह्याच्या.......

कसाह्याच्या दावणीला बांधली जशी गाय,

तवा मले गायीमंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय..........

रे हंबरून वासराले...................

नं बोलता बोलता एकदा तिच्या डोळा आलं पाणी,

सांग म्हणे राजा तुझी कवा दिसल राणी,

न भरल्या डोळ्यान ............न भरल्या डोळ्यान,

भरल्या डोळ्यान कवा पाहिल दुधावर् चि सायं,

तवा मले दुधामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय..........

रे हंबरून वासराले...................

गो म्हणून म्हणतो आनंदान भरावी तुझी वटी

पुन्हा एकदा जनम घ्यावा ग माये तुझ्या पोटी,

तुझ्या चरणी.........̱ग तुझ्या चरणी,

तुझ्या चरणी ठेवून माथा धराव तुझ पाय,

तवा मले पायामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय..........

हंबरून वासराले चाटते जवा गाय,

तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय

रे हंबरून वासराले...................

नांत जन्मभराच



असतीस तू मूक

आणि मी बधीर

तरीही तुझ्या भावना

पोहोचल्याच असत्या

माझ्यापर्यंत

कारण तुझी स्पंदनं

जोडून गेलीत नातं

माझ्या स्पंदनांशी

कधीचं, जन्मभराचं


कोणत्या सप्तकात


एकेक पक्षी उडून जाताना

एकेक फांदी रिकामी होताना
उरतात मागे फक्त सुरांचे
काही पुंजके उदासवाणे
आणि उरांचे धपापणे केविलवाणे

जातील हळूहळू विरत
उरलेले नादही आसमंतात
मग लागेल आठवावं
गीत जीवनाचं गातात
कोणत्या सप्तकात


माझी कविता


येते कानावर शीळ
ध्यानीमनीही नसता
माझ्या मनाच्या अंगणी
गाते वेल्हाळ कविता

घेती काळजाचा ठाव
तिच्या सुरेल लकेरी
पाय रोकड्या शब्दांचे
पंख अर्थाचे सोनेरी

तिची उफराटी तर्‍हा
जगावेगळीच रीत
नाही येण्याला कारण
नाही जाण्याला गणित

तिच्यासाठी जोपासावे
नाते एकेक हिरवे
मुक्या कळ्यांनी करावी
रोज ऋतूंची आर्जवे

तिला द्यावयास झोका
फांदी फांदी आसुसावी
तिची वाट पहाताना
पळे युगेच भासावी

अंती सोडावा निःश्वास
जेव्हा निराश होऊन
पंख हिचे झळाळावे
तोच निःश्वास लेवुन

हिच्यासाठी साठवावा
हिर्‍यामाणकांचा चारा
हिची तहान भागवी
डोळ्यांतील अश्रू खारा

असे वेडे हे पाखरू
कधी अवचित येते
त्याच्या मंजूळ नादाने
पुन्हा नादावून जाते..

फांदी


मौन शब्दांचे सुरू आहे अघोरी!
त्यावरी ही ढिम्म अर्थांची मुजोरी!

केवढा गलका तिथेही चाललेला...
चांदण्या आहेत की आहेत पोरी!

दुःख सामोरे मला एकेक आले...
तू मला झालीस जेव्हा पाठमोरी!

मी तुझ्या केलेच आहे ना हवाली?
का मनाची तू तरी केलीस चोरी?

वाचली कविता तुझी एकेक जेव्हा...
सोडली माझी वही मी सर्व कोरी!

बोच काट्यांची तशी ही ओळखीची...
बाभळी जेथील या, तेथील बोरी!

आसवे का एवढी चमकून गेली?
भंगलेले स्वप्न होते का बिलोरी?

मी तुझ्या खेळास कंटाळून गेलो...
जन्म हा माझा, तुझी कितवी लगोरी?

कुंपणाबाहेर आली एक फांदी...
हा तिचा मोठा गुन्हा; ही बंडखोरी!


विसरुन जा तू...


विसरुन जा ते सारं काही.....

काही सांगायचे असेल तरी, सांगू नकोस,

अश्रू रहीत माझ्या मैत्रीला, तु जागवू नकोस!

काहीच ठेवले नाहीस तु माझ्यासाठी,

गरुड्झेप घातलीस तु माझ्यावरी.

तरीही मी मैत्री ठेवली तुझ्यावरी,

पण, आता मी सांगितले तरी ऐकू नकोस !

एक दिवस आपण भेटलो होतो,

एकमेकांच्या सुखःदुखात समरस झालो होतो.

आपण आपल्या मैत्रीचे गीत गात होतो,

पण, आता ते कधीच तु आठवू नकोस!

तुझ्या मैत्रीमध्ये हरवलो मी,

तुझ्यासाठी स्वतालाही विसरुन गेलो मी.

भान मात्र माझं ठेवल नाहीस तू,

पण, कधी तुझ्या समोर आलो मी, मला मात्रा पहू नकोस!

या विरहात मन माझे हरवून गेले,

शरीर माझे व्यसनात शिरले.

स्वताला व्यसनात बुडवले मी,

पण, हे उघड्या डोळ्यांनी तु पाहु नकोस!

एक दिवस मी निघुन जाईन,

या मानवांच्या दुनियेतून.

अश्रू वाहतील माझ्या मित्रांच्या नेत्रांतुन,

पण, तु तुझी नयने मात्र ओलावू नकोस!

देह माझा विसवेल या मातीत,

माझे मित्र तेथे येऊन जातील.

मला श्रध्दापुष्प वाहून जातील,

पण, मला श्रध्दांजली वाहण्यास मात्र तू विसरु नकोस.